रत्नागिरी : मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थी यंदा लागवड करता येण्यायोग्य बीजराख्या म्हणजेच प्लांटेबल सीड राख्या तयार करत आहेत. रक्षाबंधन झाल्यानंतर या राख्या कुंडीत किंवा मातीत घातल्यास त्यातून फुले-फळे देणाऱ्या वनस्पती रुजणार आहेत. या पर्यावरणपूरक राख्या खरेदी करून या उपक्रमाला साह्य करावे आणि पर्यावरणरक्षणाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेतर्फे शुक्रवारी (दोन ऑगस्ट) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. ‘गेली दोन वर्षे रक्षाबंधनाकरिता रेशमाच्या राख्यांसमवेत बांबूपासून राख्या बनवून त्यावर विविध बियांचे नक्षीकाम केले जात होते. ही राखी कुंडीत विसर्जित केल्यानंतर त्यापासून छोटीशी रोपटी उगवत असत. या वेळी वृक्षवल्ली नर्सरीच्या व्यवस्थापक माधुरी साळवी-कळंबटे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक प्लांटेबल सीड राखीच्या कल्पनेला पसंती देऊन विद्यार्थ्यांना या राखीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या राख्या सध्या विक्रीकरिता उपलब्ध आहेत,’ असे संस्थेचे अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सांगितले.
‘या उपक्रमात कार्यशाळेतील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना सामावून घेऊन प्लांटेबल सीड राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तीव्र मतिमंदत्व गटातील विद्यार्थ्यांकडून वर्तमानपत्राचे लहान तुकडे करण्याचे काम करून घेतले जाते. मध्यम मतिमंदत्व गटातील विद्यार्थ्यांना या कागदी तुकड्यांचा लगदा करणे, शाडू मातीसमवेत त्याचे मिश्रण करणे ही कामे सांगितली जातात. या मिश्रणामध्ये कागदी लगद्याचे प्रमाण ४० टक्के व शाडूच्या मातीचे प्रमाण ६० टक्के असते. याप्रमाणे ते मिश्रण विद्यार्थ्यांकडून मळून घेतले जाते. त्याचे छोटे छोटे गोळे करणे, त्याला आकार देणे, त्यात विविध झाडांच्या बिया घालून राखी तयार करणे अशा टप्प्यांतील कामे मध्यम मतिमंदत्व गटातील विद्यार्थी करतात. होल पाडणे, फिनिशिंग करणे, रंगविणे, दोरे बांधणे आणि गाठी मारून राख्या विक्रीयोग्य करण्याचे प्रशिक्षण सौम्य मतिमंदत्व गटातील विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थी ही अनोखी पर्यावरणपूरक राखी खूप आवडीने बनवितात,’ असे वायंगणकर यांनी सांगितले.
‘या राख्या पाच ग्रॅम, १० ग्रॅम, ११ ग्रॅम अशा अल्प वजनामध्ये उपलब्ध असून कार्यशाळेमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत. या राखीच्या वापरानंतर ती थोडा वेळ पाण्यात भिजवून नंतर कुंडीत किंवा मातीत कुस्करून टाकली असता त्यापासून फळे - फुले देणाऱ्या वनस्पती उगवून निसर्गाच्या संवर्धनास हातभार लागणार आहे,’ असे वायंगणकर म्हणाले.
‘कार्यशाळेचे विद्यार्थी आपल्या सुप्त गुणांचा वापर करून नवनव्या सर्जनशील निरागस संधींची कास धरून प्रगती साधत आहेत. मोठ्या उत्साहाने हे विद्यार्थी या राख्या बनवित आहेत. या प्लांटेबल सीड राख्या सर्व बहिणींनी आपल्या भाऊरायांना बांधून निसर्ग संरक्षणाचाही संदेश द्यावा. तसेच विशेष मुलांच्या असामान्य कलाकुसरीला वाव देऊन यंदापासून असे अनोखे रक्षाबंधन सर्व बहीण-भावांनी साजरे करावे,’ असे आवाहन वृक्षवल्ली नर्सरीच्या व्यवस्थापक माधुरी साळवी-कळंबटे आणि कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांच्यासह ‘आविष्कार’ परिवाराकडून करण्यात आले.
सर्व सण-समारंभ पर्यावरणपूरक होण्यासाठी आविष्कार संस्थेची श्यामराव भिडे कार्यशाळा नेहमीच प्रयत्नशील असते. आषाढी एकादशीला खास वृक्षलागवडीचा संदेश देणारी वृक्षदिंडी काढून विविध रोपांची लागवड करण्यात आली. या रोपट्यांची काळजी कार्यशाळेचे सर्व विद्यार्थी आवर्जून घेतात. कागदाच्या लगद्यापासून खास नागमूर्ती बनवून नागपंचमी साजरी केली जाते. मुलांनी बनविलेल्या कागदाच्या लगद्याच्या नागमूर्ती विक्रीकरिताही उपलब्ध असतात. गणेशोत्सवात हे विद्यार्थी कागदाचा लगदा आणि मातीपासून गणेशमूर्ती बनवितात आणि त्याची स्थापना केली जाते, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
पत्ता : ई-९५, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी ४१६ ६३९.
दूरध्वनी : (०२३५२) २२८८५२, २२९५१७
ई-मेल : aavishkar.ratnagiri@gmail.com
(आविष्कार संस्थेविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)